जमीनीची मोजणीनंतरचे प्रश्न :



मोजणीनंतरचे प्रश्न :
अनेक वेळेला शेतकर्‍यांना लगतच्या खातेदारांनी बाध कोरल्यास किंवा अतिक्रमण केल्यास नक्की काय करावे हे समजत नाही. जमीनीची मोजणी होऊनसुध्दा प्रत्यक्ष अतिक्रमण केलेले क्षेत्र कब्जे वहिवाटीस येत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष न्याय मिळत नाही अशी भावना निर्माण होतांना दिसते. त्यासाठी खालील गोष्टी शेतकर्‍यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.

1. ज्यांनी मोजणी फी भरली आहे त्यांच्याच बाजूने मोजणी होते हा एक मोठा सार्वत्रिक गैरसमज आहे. मोजणी ही मूळ रेकॉर्डच्या आधारे केली जात असल्याने मोजणी फी भरली म्हणून त्याच्या बाजूने मोजणी होईल ही शंका काढून टाकली पाहिजे.

2.
एखाद्या खातेदाराने मोजणी फी भरुन मोजणी करुन घेतली तरी समोरचा खातेदार ही मोजणी मान्य नाही असे सांगून केलेल्या मोजणीवर अविश्र्वास दाखवतो. तसेच मी आता स्वत: जमीन मोजणीचा अर्ज देतो व परत मोजणी झाल्यावर मी अतिक्रमणाचा ताबा देईन असे सांगतो. परंतू प्रत्यक्ष स्वत: अर्ज देत नाही. अशा वेळी मोजणी केलेल्या खातेदाराने, जर बांध सरकल्यामुळे अतिक्रमण झाले असेल तर, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम-138 नुसार अतिक्रमण क्षेत्राचा ताबा मिळण्यासाठी त्वरीत प्रांत अधिकारी यांना अर्ज केला पाहिजे व त्या बरोबर मोजणी नकाशासुध्दा जोडला पाहिजे. जर शेजारच्या शेतकर्‍याला मोजणी मान्य नसेल तर तो निमताना मोजणीसाठी अर्ज देऊ शकतो. त्यामुळे पुन्हा त्याच्या अर्जावरुन जमीन मोजण्याची वाट पाहण्याची गरज नाही. त्याशिवाय दिवाणी कोर्टात सुध्दा अतिक्रमण क्षेत्राचा ताबा मिळण्यासाठी दावा लावता येतो.
3.
मोजणीच्या वेळी घाईघाईने व समोरचा शेतकरी गैरहजर असतांना किंवा त्यांच्या परस्पर मोजणी केल्यामुळे फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे शक्यतो त्याच्या उपस्थितीत मोजणी झाल्यानंतर त्याला मोजणीबद्दल आक्षेप घेणे अवघड होते. म्हणून मूळ मोजणी अर्जाबरोबर सर्व लगतच्या खातेदारांचे पत्ते देऊन त्यांना नोटीस बजावली जाईल हे पहाणे सर्वांच्या हिताचे आहे.
शेत जमीनींची मोजणी ही मोजणी खात्याने कायम स्वरुपी मोजून ठेवलेल्या मूळ रेकॉर्ड उदा.मूळ टिपण बुके, क्षेत्र बुके व नकाशे या रेकॉर्डच्या आधारे केली जाते हे आपण पाहिले आहे. परंतू शेतकरी किंवा नवीन खातेदार यांचेकडे अनेक वेळा अशी मूळ मोजणी झालेली संपूर्ण गटाची जमीन मालकी वहिवाटीस नसते. त्याचे मुख्य कारण म्हणजे मूळ गट नंबरामध्ये खरेदी विक्रीमुळे, वाटपाने, वारसाने किंवा इतर काही कारणामुळे पोट हिस्से पडतात. अशावेळी मूळ जमीनीतील काही हिस्से जर नवीन खरेदीदाराने विकत घेतले तर त्याला अशा जमीनीचा स्वतंत्र 7/12 पाहिजे असतो. उदा. एका गावातील गट नंबर 515 क्षेत्र 3 हेक्टर पैकी मूळ मालक "अ" या व्यक्तीने आपल्या जमीनीपैकी 1 हेक्टर जमीन "ब" या व्यक्तीला विकली. अशावेळी 7/12 वर मूळ मालकाचे (अ) 2 हेक्टर व नवीन खातेदाराचे (ब) 1 हेक्टर क्षेत्र मालकी हक्काने लावले जाते. तर काही गावांमध्ये 2 हेक्टर क्षेत्रासाठी 500/1 असा नंबर दिला जातो. तर "ब" च्या 1 हेक्टर जमीनीसाठी 500/2 असा भूमापन क्रमांक दिला जातो. एकत्रिकरणानंतर अशाप्रकारच्या व्यवहारांमुळे वेळोवेळी मूळ गट नंबरचे अनेक हिस्से पडले असून काही ठिकाणी तर मूळ गटांचे अ + ब+ क अशाप्रकारचे पोट हिस्सेसुध्दा पहायला मिळतात.

अशा पध्दतीने जमीन नव्याने खरेदी केलेल्या खातेदाराला आपल्या जमीनीचा स्वतंत्र 7/12 मिळाल्यामुळे व त्या 7/12 च्या पानावर मूळ मालकाच्या नावाने क्षेत्र उरलेले नसल्यामुळे आता आपण जमीनीचे स्वतंत्र मालक झालो अशी भावना निर्माण होते. परंतू मोजणी खात्याकडे मात्र मूळ रेकॉर्ड असलेले पूर्ण गट नंबर 500 याचाच नकाशा असतो. त्यामुळे थोडक्यात मोजणी खाते, या गटामध्ये शेतकर्‍याने खरेदी खताद्बारे किंवा आपआपसातील वाटपाद्बारे जे पोट हिस्से पाडले आहेत त्यास ओळखत नाही. परंतू त्यामुळे राज्यभर अशा पोट हिश्श्याच्या वहिवाटीसंबंधी वाद निर्माण झाल्यावर जेव्हा मोजणीसाठी शेतकरी अर्ज करतात व मोजणी खात्याकडून आम्ही संपूर्ण गट मोजून देऊ, परंतू आतल्या हिश्श्यांना आम्ही ओळखत नाही अशी उत्तरे दिली जातात त्यावेळी शेतकर्‍यांमध्ये संभ्रम निर्माण होतो.


SHARE THIS

->"जमीनीची मोजणीनंतरचे प्रश्न :"

Search engine name