पूर्व हंगामी उसाच्या वाढीकडे द्या लक्ष*


*संदेश देशमुख, दीपक पोतदार, डॉ. सुरेश पवार*_
पूर्वहंगामी उसासाठी हेक्‍टरी 340 किलो नत्र, 170 किलो स्फुरद व 170 किलो पालाश ही खतमात्रा शिफारशीत करण्यात आलेली आहे. रासायनिक खतांचा पहिला हप्ता (10 टक्के नत्र, 50 टक्के स्फुरद आणि 50 टक्के पालाश) ऊस लागणीच्या वेळेस आपण दिलेला असेलच. आता ऊस पीक फुटवा अवस्थेत असताना (लागणीनंतर 6 ते 8 आठवड्यांनी) रासायनिक खतांचा दुसरा हप्ता म्हणजेच शिफारशीच्या 40 टक्के नत्र द्यावे..

1) फुटवे फुटण्याच्या अवस्थेमध्ये ऊस पिकाची नत्राची गरज जास्त असते. हा दुसरा खतांचा हप्ता योग्य वेळीच योग्य प्रमाणात दिला नाही, तर त्याचा परिणाम फुटव्यांच्या संख्येवर होतो. पर्यायाने ऊस तोडणीच्या वेळी गाळपालायक उसांची संख्या कमी मिळते.

2) रासायनिक खतांची तिसरी मात्रा कांडी सुटताना म्हणजेच लागणीनंतर 12 ते 16 आठवड्यांनी द्यावी. या वेळी नत्राची गरज कमी असते, म्हणून 10 टक्के नत्र द्यावे.

3) उसासाठी शेवटची खतमात्रा मोठ्या बांधणीच्या वेळी द्यावी. या वेळी उसाची जोमदारपणे वाढ सुरू होते. म्हणून या वेळी 40 टक्के नत्र, 50 टक्के स्फुरद आणि 50 टक्के पालाश खते द्यावीत. यानंतर बांधणी करावी.

4) युरियाचा दुसरा व चौथा हप्ता देताना युरिया व निंबोळी पेंड 6ः1 या प्रमाणात मिसळून द्यावे. यामुळे युरियामधील नत्र पिकास सावकाश उपलब्ध होऊन नत्राची कार्यक्षमता वाढते. को-86032 (नीरा) या जातीस अधिक उत्पादनासाठी खतमात्रेपेक्षा 25 टक्के जादा खतमात्रा द्यावी.

5) ऊस बेण्यास ऍझिटोबॅक्‍टर व स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया केलेली असल्यास शिफारशीत रासायनिक खतमात्रेच्या 50 टक्के नत्र आणि 75 टक्के स्फुरद व 100 टक्के पालाश खताची मात्रा वरीलप्रमाणे द्यावी.

6) रासायनिक खते देताना शक्‍यतो सरळखतांचा वापर करावा.

*ऊस पिकासाठी पूर्वहंगामासाठी शिफारशीत खतमात्रा पुढीलप्रमाणे (किलो प्रतिहेक्‍टर) -*
अ.न
खतांचा हप्ता देण्याची वेळ
नत्र (युरिया)
स्फुरद (एस.एस.पी)
पालाश (एम.ओ.पी.)
1  लागणीचे वेळी
34 (74)
85 (531)
85 (142)

लागणी नंतर 6-8 आठवड्यांनी
136 (295)


लागणी नंतर 12-16 आठवड्यांनी
34 (74)

बांधणीचे वेळी
136 (295)
85 (531)
85 (142)

💧 *गरजेइतकेच द्या उसाला पाणी* 💧
1) ऊस उगवण आणि फुटवा फुटणे हा काळ 3 ते 4 महिन्यांचा असून, या सुरवातीच्या काळात उसाला पाणी कमी लागते.

2) उसासाठी पाण्याचे दोन पाळ्यांतील अंतर हे जमिनीची पाणीधारण क्षमता, पीकवाढीची अवस्था व लागवडीचा हंगाम या बाबींवर अवलंबून असते. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रातील संशोधनानुसार ऊस पिकासाठी हिवाळ्यात (नोव्हेंबर ते फेब्रुवारी) 18 ते 20 दिवसांनी, उन्हाळ्यात (मार्च ते जून) 8 ते 10 दिवसांनी आणि पावसाळ्यात (जुलै ते ऑक्‍टोबर) 12 ते 15 दिवसांनी पाणी देण्याची शिफारस करण्यात आली आहे.

3) ऊस उगवण अवस्थेमध्ये सुरवातीच्या काळात वरंबा बुडेपर्यंत पाणी देऊ नये. या वेळी उसाला जास्त पाणी दिल्यास नत्रयुक्त खते वाया जातात. कमी पाण्यामुळे जमिनीतील पाणी व हवा यांचा समतोल राखला जातो. मुळांची वाढ व कार्यक्षमता योग्य राहते.

4) मोठ्या बांधणीपर्यंत सर्वसाधारणपणे पाण्याच्या पाळ्या आठ सें.मी. खोलीच्या द्याव्यात, त्यानंतर 10 सें.मी. खोलीच्या पाळ्या द्याव्यात. यापेक्षा अधिक पाण्याचा वापर करू नये.

5) पाण्याच्या अनियंत्रित वापरामुळे जमिनी क्षारयुक्त बनतात. अतिरिक्त पाण्याचा निचरा होऊन पाण्याबरोबर अन्नद्रव्यांचाही निचरा होतो. त्यामुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता कमी होते. पाणी देताना दारे धरून पाणी द्यावे.

6) उसाला शक्‍यतो ठिबक सिंचनाने पाणी व्यवस्थापन करावे.

☎ *अधिक माहितीकरिता संपर्क -*  02169-265337, 265333

(लेखक मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, ता. फलटण, जि. सातारा येथे कार्यरत आहेत.)

📚 *स्ञोत-* एग्रोवन  फोटो फक्त प्रातिनिधिक आहे

SHARE THIS

->"पूर्व हंगामी उसाच्या वाढीकडे द्या लक्ष*"

Search engine name